भारताचा अद्वितीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव याने १९९४ साली आजच्या दिवशी (आठ फेब्रुवारी) कसोटी क्रिकेटमध्ये ४३२वा बळी घेऊन न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडला.
त्यानंतर आणखी दोन विकेट मिळवून कपिलने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; पण त्यांचा हा विक्रम आणखी सहा वर्षे अबाधित राहिला. कर्टनी वॉल्शने २०००मध्ये हा विक्रम मोडला.
मध्यमगती तेज गोलंदाजी, मधल्या फळीत धडाकेबाज फलंदाजी व कल्पक आणि समर्थ नेतृत्व यामुळे कपिल देव भारताचा ऑल टाइम सर्वोत्तम खेळाडू मानला गेला. जगभरच्या श्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेट खेळाडूंमध्ये कपिल देवचा समावेश होतो.
१९८३च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता ठरला, तेव्हा नेतृत्व कपिलकडेच होते, हा निव्वळ योगायोग नव्हे.
कपिल देवच्या भारतीय क्रिकेटमधील कामगिरीस तोड नाही, हेच खरे!
- भारतकुमार राऊत